वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात वैष्णवीचा मृत्यू हा कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठीचा अत्याचार यामुळेच झाल्याचं नमूद करण्यात आलंय. वैष्णवीचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही, किंवा ती फक्त आत्महत्येची घटना नाही तर तो हुंडाबळीचा प्रकार आहे. पोलिसांनी त्याच दिशेने तपास करण्याची गरज असल्याच अहवालात नमूद करण्यात आलंय. या समितीने आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत महत्वाची शिफारस अहवालात केली आहे.
सुपेकर यांचा सहभाग या प्रकरणात आढळून आला आहे. सुपेकरांची ध्वनिफीत देखील समोर आली. त्यामुळे सुपेकरांना निलंबित करून त्यांना सहआरोपी करण्याची शिफारस या समितीने केलीय. या समितीचे तिसरा महत्वाचा निष्कर्ष पुणे ग्रामीण पोलिसांबाबत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वैष्णवीची आत्महत्या घडल्याचं समितीने म्हटलंय. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरीने मारहाण, छळ , विनयभंग , मारून टाकण्याची धमकी अशा अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने वैष्णवीची आत्महत्या झाल्याचं म्हटलंय.