प्रेमाला वय नसतं हेच खरं आणि विश्वास या शब्दावर जर नातं टिकून असेल तर ते कुणीही तोडू शकत नाही. याचंच एक उदाहरण राजस्थानमध्ये पहायला मिळालं. ७० वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर, ९५ वर्षीय रामा भाई खरारी आणि ९० वर्षीय जीवाली देवी अखेर राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकले. गलांदरमध्ये वास्तव्यास असणारं हे जोडपं मागील 70 वर्षांपासून एकत्र राहत होते. आपल्या या नात्यावर अखेर लग्नाचा शिक्का मारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
रामा भाई खरारी आणि जीवाली देवी गेल्या सात दशकांपासून एकत्र राहत होते. त्यांनी घर आणि आयुष्याची विभागणीच केली होती. त्यांना सहा मुलं असून, त्यातील चौघे सरकारी पदांवर कार्यरत आहेत. त्यांचा सर्वात मोठा मुलगा 60 वर्षांचा आहे. आज त्यांच्या सर्व मुलांची लग्न झाली असून, आपला संसार सांभाळत आहेत.
नुकतंच या जोडप्याने अधिकृतपणे लग्न करण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्या लग्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांच्या लग्नाचा उत्सव संपूर्ण गावात साजरा करण्यात आला. जोडप्याची बिंदौली (पारंपारिक लग्नापूर्वीची मिरवणूक) संगीत आणि नृत्याने रंगली, ज्यामध्ये गावकरी आणि जोडप्याची मुलं सामील झाली. सप्तपदीनंतर, नवविवाहित जोडप्याच्या सन्मानार्थ एक सामुदायिक मेजवानी आयोजित करण्यात आली.