उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र ही युती करताना ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार की काय? अशी चर्चा आणि कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. यामागील कारण ठरत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्त संजय राऊत यांनी केलेलं एक विधान.
“सध्या महाराष्ट्रात दोनच समाविचारी पक्ष आहेत. दोनच समाविचारे नेते आहेत. एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे!” असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आहे. मात्र आता ते राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी महाविकास आघाडीची साथ सोडणार की काय अशी चर्चा राऊतांचं विधान ऐकल्यानंतर सुरु झाली आहे. राऊतांच्या विधानाचा इशारा त्याच दिशेने तर नाही ना? असंही बोललं जात आहे.