ठाकरे बंधू विजयी मेळाव्यात एकत्र दिसणार असल्यानं संपूर्ण राज्यासह राजकीय वर्तुळाचं लक्षसुद्धा याच घडामोडीकडे लागलं आहे. इथं या मेळाव्यानं नजरा वळवलेल्या असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सावधगिरीनं पावलं उचलत पक्षातील आमदारांना काही स्पष्ट सूचना केल्या आहेत. राज्यातील एकंदर राजकीय स्थिती पाहता फडणवीसांनी भाजपा आमदारांना दिलेल्या या सूचना आणि सल्ले पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्यांना पक्षाकडून दमदार कामगिरीच अपेक्षित असल्याचं स्पष्ट होत आहे.
भाजपातील आमदारांना नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनासाठी बोलवण्यात आलं होतं. यावेळी विकासकामांसह मतदारांच्या हितासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. ‘मतदार आणि मतदारसंघंच्याच हिताचा विचार करून कामं करा. कॉन्ट्रॅक्ट, टेंडरच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा’ असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
मतदारांचं हित केंद्रस्थानी ठेवत त्यांचं भलं कशात आहे याचा विचार करूनच कामं केली पाहिजेत अशी सूचना देत. आमदार निधीचा योग्य वापर करा असंही सांगितलं. राज्यासमोर असणाऱ्या आर्थिक अडचणींचा फटका विकासकामांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.