तब्बल 701 किलोमीटर लांबीचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडला जाणार आहे. फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील वाढवण बंदर हा मोदी सरकारचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे. समुद्रकिनाऱ्यावर 20 मीटरपेक्षा जास्त खोली असलेलं हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे अजस्त्र कंटेनर येथे सहज येवू शकतात. जवळपास 298 मिलियन टन क्षमतेचं हे देशातील 13 व्या क्रमांकाचं बंदर असेल. वाढवण बंदर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर जगातील टॉप 10 कंटेनर पोर्ट देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईनंतर नाशिक हे महाराष्ट्राचे तिसरे औद्योगिक केंद्र आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग इगतपुरी ते वाढवण डीप सी पोर्ट थेट जोडण्यासाठी नवीन 85 किमी प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे बांधण्याची योजना MSRDC आखत आहे.