उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तराखंडच्या काही भागांत सुरू असलेल्या बर्फवृष्टी दरम्यान ही दुःखद घटना घडली आहे. वृत्तानुसार, चमोली येथील बद्रीनाथ धाम येथील माना गावाजवळील हिमनदीखाली गाडलेल्या ५७ कामगारांपैकी १६ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित ४१ कामगारांचा शोध सुरू आहे. हे सर्व कामगार बीआरओशी करार केलेल्या कंत्राटदाराचे असल्याचे सांगण्यात येत आहे. चमोलीच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर महामार्गाजवळ हा अपघात झाला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या अपघातावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओकडून सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अनेक कामगार हिमस्खलनाखाली दबल्याची दुःखद बातमी कळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो”, असे मुख्यमंत्री धामी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले.