१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. आता पहिल्यांदाच सरकारने या घटनेची स्पष्ट माहिती दिली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचा बळी ठरलेले विमान टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच अडचणीत सापडले. फ्लाइट एआय-171 फक्त ६५० फूट उंचीवर जाऊ शकले आणि नंतर वेगाने खाली पडू लागले. पायलटने आपत्कालीन कॉल केला पण खूप कमी वेळ होता. अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
शनिवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अहमदाबाद विमान अपघाताबाबत पहिली अधिकृत पत्रकार परिषद घेतली. एअर इंडियाचे विमान एआय-171 ने दुपारी १.३८ वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केले. टेकऑफ केल्यानंतर एका मिनिटातच, फ्लाइट फक्त ६५० फूट उंचीवर पोहोचू शकले आणि नंतर अचानक खाली पडू लागले. वैमानिकाने दुपारी १.३९ वाजता नियंत्रण टॉवरला ‘मे डे’ कॉल पाठवला होता, अशी माहिती मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांनी दिली. पण अवघ्या एका मिनिटानंतर विमान शहरातील मेघानीनगर परिसरातील वैद्यकीय वसतिगृहाच्या इमारतींवर कोसळले. या अपघातात विमानातील २४२ प्रवाशांपैकी फक्त एकच व्यक्ती वाचली. याशिवाय जमिनीवर उपस्थित असलेल्या २० हून अधिक लोकांचाही मृत्यू झाला.