नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पार पडली. यावेळी आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसंच अजित पवारांनी नुकत्याच सादर केलेल्या राज्याचा अर्थसंकल्पात स्मारकासाठी तरतूद करण्यात आली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
हे स्मारक उभारण्यासाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.