भारत आणि पाकिस्तानात सध्या तणावाचे वातावरण आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला दणका दिल्यानंतर भारतातून पाकिस्तानी हेर सतत पकडले जातायत. याची सुरुवात ज्योती मल्होत्रापासून झाली आणि आतापर्यंत अनेक हेर एजन्सींच्या तावडीत सापडलेयत. अलीकडेच महाराष्ट्र एटीएसने त्याच आरोपाखाली ज्युनिअर संरक्षण कंत्राटदार रवींद्र मुरलीधर वर्माला अटक केलीय. २७ वर्षीय रवींद्र मुरलीधरवर पाकिस्तानशी संबंधित एजंटांना भारतीय नौदलाच्या जहाजे आणि पाणबुड्यांशी संबंधित गुप्त माहिती दिल्याचा आरोप आहे. यामध्ये १४ युद्धनौकांची माहिती समाविष्ट आहे. त्यापैकी ५ माहिती पूर्णपणे बरोबर आणि गोपनीय असल्याचे आढळून आलंय.
मुरलीधर करसानी डिफेन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करायचा. ही कंपनी इंडियन नेव्हल डॉकयार्ड, माझगाव डॉक आणि कोस्ट गार्ड सारख्या प्रमुख संरक्षण संस्थांची दुरुस्ती करते. इलेक्ट्रिकल विभागात असल्याने त्याला गुप्त नौदल क्षेत्रात जाण्याची परवानगी होती. याचा फायदा घेत वर्मा पाकिस्तानला गुप्त माहिती देऊ लागला.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये मुरलीधरला ‘पायल शर्मा’ आणि ‘इशप्रीत’ नावाच्या बनावट फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आल्या होत्या. हे अकाउंट पाकिस्तानी एजंट बनावट नावांनी चालवत असल्याचे सांगण्यात आले. पायल शर्मा आणि इशप्रीत यांनी स्वतःची ओळख भारतीय नौदलाशी संबंधित संशोधक म्हणून करून दिली. काही आठवड्यांत या लोकांमधील संभाषण भावनिक पातळीवर पोहोचले होते.
रविंद्र वर्मा भावनेच्या आहारी जात आणि पैशाच्या बदल्यात माहिती शेअर करू लागला. रविंद्र कोणाला आणि कोणती माहिती देतोय हे त्याला माहित होते. नौदल क्षेत्रात मोबाईल फोन बाळगण्यास मनाई असते पण वर्माने नियम तोडले आणि माहिती लक्षात ठेवली आणि नंतर ती स्केचेस, आकृत्या किंवा ऑडिओ संदेशांच्या स्वरूपात पाकिस्तानला पाठवल्याचे वृत्त समोर येत आहे. ‘माझा मुलगा एका महिलेच्या जाळ्यात अडकला होता आणि त्याला ब्लॅकमेल करण्यात आले होते, असे रविंद्रच्या आईने सांगितले.