संसदेत वक्फ विधेयक सादर झाले आणि दोन्ही सभागृहात पारित करण्यात आले. मात्र याचा भाजपच्या मित्र पक्षाला मोठा धक्का बसला असून त्या पक्षाचे पाच सदस्य सोडून गेले आहेत.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू पक्षातील मुस्लिम नेते नाराज आहेत. या विधेयकाला जेडीयू ने संसदेत पाठिंबा दिला, त्यामुळे नाराज होऊन काही नेत्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आरोप केले आहेत.
वक्फ संशोधन विधेयक मंजूर झाल्यावर, जवळपास पाच नेत्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. नदीम अख्तर यांनी सर्वात आधी राजीनामा दिला. त्यानंतर जेडीयू नेते राजू नैयर, तबरेज सिद्दीकी अलीग, मोहम्मद शाहनवाज मलिक आणि मोहम्मद कासिम अंसारी यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. जेडीयू चे मुस्लिम नेते रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जेडीयू चे काही मोठे मुस्लिम नेते लवकरच मोठी घोषणा करू शकतात.
राजू नैयर यांनी पक्षाबद्दलची त्यांची निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मुस्लिमांवर अन्याय करणाऱ्या या काळ्या कायद्याच्या बाजूने जेडीयू ने मतदान केल्याने मी खूप दुःखी आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘मी जेडीयू च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून मला सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त करण्याची विनंती करतो.’ शाहनवाज मलिक यांनी नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘आमच्यासारख्या लाखो भारतीय मुस्लिमांचा असा विश्वास होता की, तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारेसाठी उभे आहात. तो विश्वास आता तुटला आहे.’ याचा अर्थ, शाहनवाज मलिक यांना नितीश कुमार यांच्यावरचा विश्वास उडाला आहे.
या सगळ्या घटनांमुळे जेडीयू मध्ये खळबळ माजली आहे. अनेक मुस्लिम नेते राजीनामा देत आहेत. नितीश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. राजकीय वर्तुळात याबद्दल चर्चा सुरू आहे.