गेल्यात काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातच आज छत्तीसडगडमधील विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

बस्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत ठार झालले्या नक्षलवाद्यांची संख्या जास्त असू शकते. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरु आहे. या चकमकीच्या ठिकाणी अनेक स्वयंचलित शस्त्रे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत. ही चकमक गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली. परिसरात शोध मोहीम सुरु असून मृतांची संख्या वाढू शकते. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. तीन जिल्ह्यांतील सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.