राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाराणसी दौऱ्यात जातभेद संपवण्यावर आणि पर्यायवरणाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे चार दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर होते. रविवारी वाराणसीमधील लाजपत नगर येथील शाखेमध्ये ते गेले होते. त्यावेळी जातभेद संपवण्याबाबत, पर्यायवरण आणि अर्थव्यवस्थेवर ते बोलत होते.
यादरम्यान मोहन भागवत यांना एका स्वयंसेवकाने, मुसलमान आरएसएसमध्ये (RSS) येऊ शकतात का? असा प्रश्न केला होता. यावर मोहन भागवत यांनी एक मोठे विधान केले आहे.
आरएसएसमध्ये भारतातील सर्वांचं स्वागत आहे. पण प्रत्येकासाठी एक अट असणार ती म्हणजे शाखेत सामील होणाऱ्या प्रत्येकाला ‘भारत माता की जय’ ही घोषणा किंवा नारा देताना मनात कसलाही संकोच वाटता कामा नये. त्यांना भगव्या ध्वजाचा आदरही असला पाहिजे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भागवत यांनी दिलेल्या या उत्तराची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. भारतातील सर्व धर्म, पंथ आणि जातीमधील लोकांचे प्रत्येक शाखेत स्वागत असल्याचंही मोहन भागवतांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी भारत देशाला विश्वगुरू बनवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार असल्याचं म्हणत विद्वानांशी संवाद साधला.