मुंबई हायकोर्टाने कबुतरांना अन्न, पाणी देण्यावर बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. तसंच तज्ज्ञाची कमिटी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने पुढील सुनावणीला अॅटर्नी जनरलला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.
मुंबई हायकोर्टाच्या आणि सरकारच्या निर्देशाचं पालन करत पालिकेकडून मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्यात आले होते. मात्र त्यावरुन काहींनी विरोध केला आणि बुधवारी तर जैन समाजाने रस्त्यावर आक्रमक आंदोलन करत दादरमध्ये लावण्यात ताडपत्री फाडून टाकली.
कबुतरखाना बंद करण्याविरोधात बुधवारी जैन समाज आक्रमक झाला होता. यावेळी आंदोलन करत ताडपत्री फाडून टाकण्यात आली. तसंच पुन्हा एकदा कबुतरांना खाद्य टाकण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांचा विरोध डावलला होता. यानंतर मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जे झालं ते चुकीचं असून प्रकऱण न्यायप्रविष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच कोर्टात सुनावणी होणार असून, त्याआधी संयम पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार आज कोर्टात सुनावणी पार पडली.