संपूर्ण देश ज्यांची श्वास रोखून वाट पाहत होता ते शुभांशू शुक्ला 18 दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीवर परतले आहेत. अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात18 दिवस घालवल्यानंतर त्यांचे अंतराळयान ‘ग्रेस’ कॅप्सूल प्रशांत महासागरात उतरले. मुलगा सुखरुप पृथ्वीवर परतल्यामुळे शुभांशू शुक्ला यांच्या आईने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र पृथ्वीवर परतल्यानंतरही त्यांची आई त्यांना मिठी मारू शकणार नाही.कारण अंतराळातून परतल्यानंतर त्यांना थेट घरी पाठवले जाणार नाही तर प्रथम त्यांना नासाच्या वैद्यकीय आणि पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात येत आहे.
अंतराळाच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वेळ घालवल्यानंतर शरीराचे स्नायू कमकुवत होतात. प्रवासी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात परत येताच त्यांना चक्कर येणे, थकवा आणि संतुलन बिघडणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या कारणास्तव नासा त्यांना थेट कुटुंबाशी भेटण्याऐवजी प्रथम फ्लाइट सर्जनच्या देखरेखीखाली ठेवते. त्यामुळे शुभांशुना पृथ्वीवर परताच आईला भेटता आले नाही.