इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. विशेषतः कर्णधारपदावर बदल होण्याची शक्यता आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाऊन वनडे आणि T20 मालिका खेळण्याची शक्यता आहे. त्यासाठी संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, तर काही मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
सध्या टीम इंडिया इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेचं नेतृत्व शुभमन गिल करत आहेत. ही मालिका ४ ऑगस्टपर्यंत संपेल, त्यानंतर भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाऊ शकतो. या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन T20 सामने खेळले जाणार आहेत. सुरुवातीला राजनैतिक कारणांमुळे दौरा रद्द होण्याची शक्यता होती, पण सध्या कोणतीही अधिकृत सूचना सरकारकडून न आल्याने दौरा होण्याची शक्यता वाढली आहे.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात १७ ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होऊ शकते. जर दौरा झाला, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडेत पुनरागमन करू शकतात. रोहित शर्मा पुन्हा वनडे संघाचे नेतृत्व करू शकतो. मात्र T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा सहभाग निश्चित नाही, कारण अलीकडेच त्याची हर्नियाची शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या विश्रांती घेत रिकव्हरी करत आहे.