राज्य परिवहन विभागाच्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सीस्टिम (आयटीएमएस) अंतर्गत मुंबई-पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलान जारी करण्यात आले. त्यापैकी सहा लाख २४ हजार चलान चुकीचे असल्याचे वाहतूकदार के. व्ही. शेट्टी यांना माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशीलात उघडकीस आले आहे. त्यामुळे ‘आयटीएमएस’च्या कार्यक्षमतेवर वाहनचालक आणि वाहतूकदार शंका उपस्थित करत आहेत.
अनेकदा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर चुकीच्या पद्धीतने चलान कापले जाते अशी वाहनचालकांची तक्रार असते. बऱ्याच ठिकाणी आवश्यकता नसल्याने वेगमर्यादा नियंत्रित ठेवण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट वाहनक्रमांकाशी संलग्न मोबाईल क्रमांकावर चलान कापण्यात आल्याची माहिती मेसेजच्या माध्यमातून पुरवली जाते. या सर्व यंत्रणेमध्ये मानवी हस्तेक्षप नसल्याने नियम मोडलेला नसतानाही झालेलं चलान अनेकजण अधिक कुठे प्रकरण वाढवायचं असं म्हणत भरुन टाकतात. मात्र आता या अशा चलान कापण्याच्या पद्धतीमधील प्रत्येक १०० चलानांपैकी ३४ चलान चुकीच्या पद्धतीने कापण्यात आल्याचं समोर आलं आहे. ही धक्कादायक माहिती सरकारनेच माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात दिली आहे, हे विशेष!